रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन, भाजी विक्रेत्यांसाठी नवीन योजना | New Scheme for Rickshawala, Tapariwala, Watchman, Vegetable Vendors
New Scheme for Rickshawala Tapariwala Watchman Vegetable Vendors Maharashtra
शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडाच्या काळात उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना रिक्षावाला, तर त्यांच्या गटातील काही आमदारांना ते एकेकाळी वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला असल्याचे हिणवले होते.
या खिल्लीला उत्तर म्हणून समाजघटकांसाठी कल्याणाची योजना शिंदे सरकार आणणार आहे. माजी मंत्री व शिंदे गटाचे उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत सूतोवाच केले.
राज्यात ८ लाख ३२ हजार रिक्षा तर ९० हजार टॅक्सी परवानाधारक आहेत. हा कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मंडळ स्थापन करण्याची मागणी सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेऊन या कष्टकरी जनतेला या दिलासा देणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. भाजी व्यावसायिकांना टोलमुक्ती देऊन दिलासा देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे.
सुरक्षारक्षक यांच्या वेतनात मोठी वेतनवाढ करण्याबरोबरच त्यांना निवृत्तिवेतन देण्याचा मानस आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा विचार करीत आहे.