मुंबई: राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सोमवारी शिक्षण मंत्रालयातून आदेश बजावण्यात आले.
वर्षानुवर्षे ‘डोनेशन’ भरून अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा शिक्षण संस्था चालकांचा फंडा मोडित काढण्यासाठी तत्कालीन युती शासनाने अभियोग्यता चाचणी आणि पवित्र पोर्टल आणले.
डिसेंबर 2017 मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. पावणेदोन लाखांपेक्षा अधिक डीएड, बीएडधारक उमेदवारांनी या परीक्षेत पात्रता सिद्ध केली.
त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगरपरिषद, महापालिकांच्या शाळांमध्ये 2019 मध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
आता 2021 मध्ये विविध खासगी शिक्षण संस्थांमध्ये 2062 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. (Aptitude test for teacher recruitment)
31 ऑक्टोबरपर्यंत या उमेदवारांच्या मुलाखती आटोपून दिवाळी सुटीनंतर त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आहेत. मात्र, अद्याप बहुतांश उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही.
दुसरीकडे, 2017 मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या साडेबारा हजार पदांपैकी चार हजार पदांची भरती प्रक्रिया सुरूच झालेली नाही.
फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या अभियोग्यता परीक्षेच्या निमित्ताने पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अशा उमेदवारांना एक संधी चालून आली आहे. त्यामुळे या चाचणीत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिवाय पहिल्या परीक्षेत ज्यांना अत्यल्प गुण मिळाले, त्यांना आपली श्रेणीवाढ करण्यासाठीही 2022 ची परीक्षा नवी संधी ठरणार आहे. ‘Maha-Tait Exam’
तथापि, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे परीक्षेनंतर त्या प्रवर्गाच्या उमेदवारांनाच संधी मिळेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.